Monday, January 10, 2011

नो वन किल्ड जेसिका- पॉवरपॅक्ड

नो वन किल्ड जेसिका- पॉवरपॅक्ड

एक ब्रिलियंट दिग्दर्शक काय करू शकतो? जेसिका लाल हत्या प्रकरणासारखा परिचित, भरपूर प्रसिद्धी मिळालेला विषय घेऊन, त्यातले सगळे बारकावे प्रेक्षकांना माहीत अतानाही त्यात असंख्य छोटेछोटे उल्लेखनीय क्षण निर्माण करून एक बेहेतरीन, पॉवरफुल सिनेमा निर्माण करू शकतो. दिग्दर्शक राजकुमार गुप्ताने नेमकं तेच केलंय. पदार्पणातच आमीरसारखा टेरिफिक सिनेमा देणा-या गुप्ताने नो वन किल्ड जेसिकामध्ये आपल्या कर्तृत्वाचे स्फोट घडवले आहेत.

दिल्लीत झालेल्या जेसिका लाल हत्येच्या घटनेवर हा चित्रपट आधा
रित आहे. हे प्रकरण सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे चित्रपटाची कथा पुन्हा सांगण्यात अर्थ नाही. पण, गुप्ताने पटकथेत बारीकसारीक गोष्टी अशा खुबीने पेरल्यात की, आपण एका विलक्षण बुद्धिमान दिग्दर्शकाचा सिनेमा पाहतोय, हे पहिल्या फ्रेमपासून जाणवत राहतं. यातल्या व्यक्तिरेखा अभ्यासण्यासारख्या आहेत आणि अर्थातच पटकथा. एखाद् दोन किरकोळ दोष वगळता पटकथेत त्रुटी नाहीत.

गुप्ताने चित्रपटाचे सरळ दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात जेसिकाची हत्या
, पोलिस तपास, न्यायालयीन खटला, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, साक्षीदार फुटू नयेत म्हणून जेसिकाची बहीण सब्रिनाची चाललेली धडपड, घालमेल आणि पैसा व सत्तेसमोर हतबल होऊन पराभव पत्करणं हा सगळा भाग येतो. हे एकीकडे चाललेलं असतानाच पत्रकार मीराची व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश होते. निर्भीड, धाडसी आणि हाय प्रोफाइल पत्रकार. कारगिल युद्धात युद्धभूमीवरून रिपोर्टिग करणारी मीरा तिच्या वाहिनीची स्टार पत्रकार आहे. स्पष्टवक्ती, शिवराळ आणि तिच्याच भाषेत सांगायचं तर बिचम्हणजे कुत्री. सुरुवातीला ती जेसिका लाल प्रकरणाला महत्त्व देत नाही. पबमध्ये ३०० माणसांच्या समोर झालेली ही हत्या म्हणजे तिच्या लेखी ओपन अँड शटकेस असल्यामुळे तिला त्यात काहीच आव्हान दिसत नाही. पण पुराव्याअभावी आरोपी सुटतात आणि तिला धक्का बसतो. मध्यांतरावरचा हा पंच गुप्ताने सुरेख घेतला आहे. मीरा हे प्रकरण हाती घ्यायचं ठरवते त्यामागे अन्यायाविरुद्धची चीड याबरोबरच या प्रकरणाचं महत्त्व आपण ओळखू शकलो नाही, त्याचे कंगोरे आपण ध्यानातच घेतले नाहीत, हा तिला पत्रकार म्हणून स्वत:चा पराभव वाटतो. त्यामुळेच ती हे प्रकरण हाती घ्यायचं ठरवते.

गुप्ताने पटकथेची बांधणी अत्यंत हुशारीने केली आहे. हा दोन महिलांचा अन्यायाविरुद्ध लढा असला तरी त्यांचा एकत्र लढा नाही. पूर्वार्धात राणी आणि विद्या केवळ एका प्रसंगात समोरासमोर येतात. इन फॅक्ट पूर्वार्धात राणीची व्यक्तिरेखा या लढय़ात कुठेही नाही. हा सगळा भाग विद्याच्या खांद्यांवर आहे. विद्याची व्यक्तिरेखा अत्यंत संयत (आणि राणीच्या व्यक्तिरेखेला 100 टक्के काँट्रास्ट) आहे आणि तिने ती टेरिफिक केलीये. बहीण गमावल्याचं दु:ख
, म्हातारे आईबाप त्यामुळे न्यायासाठी तिची एकटीचीच चाललेली धावपळ, पोलिसांनी तपास नीट करावा म्हणून साक्षीदारांनी उलटू नये म्हणून तिची चाललेली धडपड, न्याय नाकारला गेल्यानंतर इथल्या व्यवस्थेवरचा तिचा उडालेला विश्वास आणि त्यामुळे तिचं स्वत:च्याच कोषात जाणं हे विद्याने तर सुरेख दाखवलंच आहे, पण मुळात लिखाणातूनही हे सगळे पैलू अत्यंत प्रभावाने समोर येतात. एका प्रसंगात आपल्याच तंद्रीत चाललेली सब्रिना अचानक हत्तीच्या समोर येते आणि क्षणभर गांगरते. तिचा सामना काय ताकदीच्या लोकांशी आहे आणि तिच्यासमोरचं आव्हान किती मोठं आहे, हे अवघ्या एका सेकंदात संवादांचा आधार न घेता दिग्दर्शक दाखवतो. सिंपली ब्रिलियंट!! आणि मध्यांतरानंतर इट्स ऑल राणीज शो.

उत्तरार्धातही विद्या आणि राणी क्लायमॅक्स आणि त्यापूर्वीचा एखादा प्रसंग वगळता एकत्र येतच नाहीत. पत्रकार मीरा स्वतंत्रपणे
जस्टिस फॉर जेसिकाकँपेन चालवते. लोकांचा वाढता पाठिंबा बघून ती सब्रिनाला गाठण्याचा प्रयत्न करते. पण न्यायावरचा विश्वास उडालेली सब्रिना पुन्हा या लढय़ात उतरण्यास नकार देते, त्यावेळी मीराचा होणारा स्फोट आणि त्यातला राणीचा अभिनय बघण्यासारखा आहे.

असे असंख्य क्षण लेखक-दिग्दर्शक गुप्ताने
नो वन किल्ड जेसिकामध्ये निर्माण केले आहेत, ज्यामुळे एक अत्यंत पॉवरफुल ड्रामा पाहायला मिळतो, तेही मेलोड्रामा किंवा सवंगपणाच्या आहारी न जाता. अमित त्रिवेदीचं टेरिफिक टायटल साँग सुरुवातीलाच वापरून गुप्ता पहिलेछूट आपली मानसिकता तयार करतो. इथून पुढे एक क्षणही आपली नजर पडद्यावरून हलणार नाही, याची काळजी त्याने घेतली आहे. सुरुवातीला राणीच्या आवाजातील निवेदनात जेसिका प्रकरण घडलं त्याच्या आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय घटनांचा लेखाजोखा देत त्याने तो काळ उभा केला आहे. 1998 मध्ये भारताने केलेली अणुचाचणी आणि त्यापाठोपाठ पुढच्याच वर्षी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर देशात निर्माण झालेलं वातावरण आणि आपण भारतीय असल्याच्या भावनेने एकत्र आलेले लोक यांचा सुरुवातीलाच दिलेला संदर्भ उत्तरार्धात जस्टिस फॉर जेसिकासाठी लोकांची एकत्र येण्याची प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण करतो. केवळ मीरा आणि सब्रिनाच नव्हे, तर या प्रकरणाचा तपास करणारा पोलिस अधिकारी एन. के. (राजेश शर्मा - टेरिफिक) आणि आरोपीचा वकील श्याम तोलानी या व्यक्तिरेखाही अस्सल झाल्या आहेत. जेसिकाची भूमिका करणारी मायराही लक्षात राहते.

पण पटकथेची इतकी बंदिस्त बांधणी करणा-या
, व्यक्तिरेखांवर इतकी मेहनत घेणाऱ्या गुप्ताने सब्रिनाचे आई-वडील आणि जेसिकाची हत्या करणा-या प्रमुख आरोपीची आई या व्यक्तिरेखा कॅरिकेचरिश रंगवल्या आहेत. दिल्लीतले अत्यंत पॉवरफुल राजकारणी आणि मंत्री असलेल्या, आरोपीच्या वडिलांची व्यक्तिरेखाही अगदी सौम्य आहे. पटकथेतली एक ढोबळ चूक म्हणजे या मंत्र्याला मुख्यमंत्री राजीनामा द्यायला सांगतात, तेव्हा फोनवरून मुख्यमंत्र्याचा जो आवाज येतो, तो पुरुषाचा आहे आणि नंतरच्या एका प्रसंगात मीडिया दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारते, त्यावेळी महिला मुख्यमंत्री (शीला दीक्षित?) आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये फार कालावधी लोटलेला नाही. त्यामुळे मधल्या काळात मुख्यमंत्री बदलला गेला असण्याची शक्यताही नाही.

पण हे दोष नजरेआड केले पाहिजेत. कारण
आय हेट लव स्टोरीजसारख्या अर्थहीन गुळमुळीत आणि नो प्रॉब्लेमसारख्या बिनडोक कॉमेडी चित्रपटांचा मारा होत असताना नो वन किल्ड जेसिकासारखा पॉवरफुल, बुद्धिमान सिनेमा बघायला मिळणं, यासारखं दुसरं सुख नाही. जस्ट गो फॉर इट!!
  • चित्रपट: नो वन किल्ड जेसिका
  • पटकथा -दिग्दर्शक: राजकुमार गुप्ता
  • संगीत :अमित त्रिवेदी
  • कलाकार: विद्या बालन, राणी मुखर्जी,राजेश शर्मा, मायरा

No comments:

Post a Comment