ये है मुंबई मेरी जान!
"किरण रावने मुंबईची विविध, विलोभनीय रूपं दाखवताना यातल्या कुठल्याच कथानकाचं फेअरीटेल करण्याचं टाळलंय. म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखा आपापली अपरिहार्य वाट चालत राहाते. दिग्दर्शकाने अत्यंत प्रेमाने या व्यक्तिरेखा (मुंबईसहीत) प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. म्हणूनच चित्रपट संपल्यानंतरही त्या आपल्या मनाचा ताबा सोडत नाहीत. कुठलीही गोष्ट आव आणून केलेली नाही. म्हणूनच यातलं बॅकग्राउंड म्युझिकही (टेरिफिक असूनही) संयत आहे, यातल्या भावनिक कल्लोळासारखंच."
अरुणच्या आर्ट एग्झिबिशनमध्ये शाय त्याला भेटते. तिला त्याच्याविषयी कुतुहल निर्माण होतं. दोघे एका रात्रीसाठी एकत्र येतात आणि वेगळे होतात. अरुण आपलं जुनं घर सोडून गजबजलेल्या मोहम्मद अली रोडवरच्या एका छोटय़ा घरात राहायला येतो. तिथे आधीच्या बि-हाडकरूच्या तीन व्हिडिओटेप्स, गळ्यातली चेन आणि अंगठी या वस्तू त्याला सापडतात. त्या व्हिडिओटेप्स म्हणजे यास्मिनने (क्रिती मल्होत्रा) आपल्या भावासाठी रेकॉर्ड केलेली पत्रं आहेत, जी ती कधीच त्याला पाठवू शकत नाही. जौनपूरसारख्या छोटय़ा शहरातून लग्न होऊन आलेली यास्मिन मुंबईभर भटकत, तिची विविध रुपं आपल्या कॅमे-यात बंदिस्त करत जाते. अरुण यास्मिनच्या विश्वात गुंतत जातो. दिग्दर्शकाने अरुण आणि यास्मिनचं हे नातं सुरेख दाखवलं आहे. एकीकडे स्वत:च्या भूतकाळाशी झगडणारा, जगापासून अलिप्त राहू पाहणारा अरुण ओळखदेखही नसलेल्या या यास्मिनमध्ये गुंतत जातो आणि तिच्या कथेतच त्याला आपलं चित्र सापडतं. दुसरीकडे शाय आणि मुन्नाची स्वतंत्र कथा सुरू होते. इस्त्रीचे कपडे पोहोचवण्यासाठी आलेल्या मुन्नाशी शायची ओळख होते आणि ती त्याच्याबरोबर मुंबईत फोटो काढत फिरू लागते. मुन्नाला चित्रपटात हिरो बनायचंय, पण तो ज्या परिस्थितीत राहतो, ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो, त्याची आणखी एक वेगळी कथा आहे. किरण रावने मुन्ना-शायमधलं अनामिक नातं छान चितारलंय.
किरण रावने मुंबईची विविध, विलोभनीय रूपं दाखवताना यातल्या कुठल्याच कथानकाचं फेअरीटेल करण्याचं टाळलंय. म्हणूनच प्रत्येक व्यक्तिरेखा आपापली अपरिहार्य वाट चालत राहाते. दिग्दर्शकाने अत्यंत प्रेमाने या व्यक्तिरेखा (मुंबईसहीत) प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत. म्हणूनच चित्रपट संपल्यानंतरही त्या आपल्या मनाचा ताबा सोडत नाहीत. कुठलीही गोष्ट आव आणून केलेली नाही. म्हणूनच यातलं बॅकग्राउंड म्युझिकही (टेरिफिक असूनही) संयत आहे, यातल्या भावनिक कल्लोळासारखंच.प्रतीक बब्बरचे विलक्षण बोलके डोळे आणि त्याच्या चेह-यावरची व्हल्नरेबिलिटी यांचा सुरेख वापर दिग्दर्शकाने केलाय. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकाला स्वत:कडे खेचून घेतो. प्रेक्षक मुन्नाच्या विश्वाशी एकरूप होतो, त्याच्यासोबत हसतो, त्याच्यासाठी हळहळतो. अमेरिकेहून सुट्टीवर आलेल्या इन्व्हेस्टमेंट बँकर कम फोटोग्राफरच्या भूमिकेत मोनिका डोग्रा (तिच्या अॅक्सेंटसह) शोभून दिसली आहे. अपरिचित, फ्रेश चेहरा आणि मोनिकाचा आत्मविश्वास यामुळे शाय दीर्घकाळ लक्षात राहील. इतकी चाकोरीबाहेरची आणि मुख्य म्हणजे चित्रपटाचा मुख्य फोकस नसलेली भूमिका केल्याबद्दल आमीरचं कौतुक करायला हवं. पण फ्रँकली आमीर-किरणने मुलाखतींमधून दावा केल्याप्रमाणे या भूमिकेसाठी आमीरच हवा होता, असं वाटत नाही. आमीर बीइंग आमीर, त्याने अरुण उत्तमच केलाय. भूमिकेतले बारकावे, सूक्ष्म भावना टिपणं, यास्मीनबद्दलचं वास्तव समजल्यानंतरचं त्याचं हादरणं हे सगळंच अप्रतिम आहे. पण या भूमिकेसाठी आमीरच अपरिहार्य होता, असं वाटत नाही. यास्मीन रंगवणारी क्रिती मल्होत्राही नैसर्गिक आहे.
पडद्यामागची बहुतांश टीम नवी आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून किरण रावचं हे पदार्पण आश्वासक आहे. भविष्यात असेच उत्तम सिनेमे तिच्याकडून पाहायला मिळतील, याची खात्री देणारं हे पदार्पण आहे. तुषार कांती रेचं छायालेखन अप्रतिम आहे. मुंबईचे विविध रंग टिपण्याची, अत्यंग गर्दीच्या ठिकाणी (अनेकदा छुप्या पद्धतीने) चित्रिकरण करूनही आवश्यक तो परिणाम मिळवण्याची अवघड जबाबदारी त्याच्यावर होती, ती त्याने यशस्वीरित्या पार पाडली आहे. अर्जेटिनाचा प्रसिद्ध संगीतकार गुस्तावो सँताओलाला (ब्रोकबॅक माउंटन, बेबल) याचं पार्श्वसंगीत चित्रपटाचा परिणाम गडद करणारं आहे. ट्रीटमेंटची गरज ओळखून त्याने संगीताचा टोन सौम्य ठेवला आहे.एकंदरीत, वेगळ्या सिनेमाकडे नजर लावून बसलेल्यांसाठी तर हा ‘मस्ट सी’ आहेच; पण फक्त गल्लाभरू सिनेमाचीच चटक असणा-यांनीही, ‘चांगला सिनेमा काय असतो’, हे पाहण्यासाठी या धोबी घाटावर अवश्य जावं.

